सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…
काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक लिंक शेयर केली त्याच बातमीची. सदभाव म्हणुन मी त्याला रीप्लाय केला. अजुनही मी तसाच होतो उदासिन त्या विषयी. दुस-याच मिनिटाला यशदिपचा फोन आला व पहिलेच वाक्य बोलला तो,”अरे बाप माणुस होता हा! सह्याद्रीतला खडानखडा त्याच्या ओळखीचा!…” यशदिपचे बोलणे सुरुच होते. मला मात्र आता समजु लागले होते नक्की काय झाले होते ते. आमचे बोलणे संपल्यावर मी आवर्जुन फेसबुक वर एक प्रोफाईल पाहिली. अरुण सावंत त्यांचे नाव. हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. पण फोटो पाहिल्यावर त्यांना कुठेतरी कधीतरी पाहिले असावे, भेटलो असावे, बोललो,त्यांचे ऐकले असावे असे वाटले.
नुसते फोटो पाहुनच त्या माणसाचे सर्व चरित्रच, नव्हे नव्हे डोंगर चरित्रच डोळ्यासमोर उभे राहिले. मला त्यांचे जे चरित्र दिसले त्यात मला त्यांचे लौकिक शिक्षण , नोकरी व्यवसाय, घर गृहस्थी दिसली नाही. त्यांनी किती संपत्ती कमाविले आणि किती नाही हे तपशील दिसले नाहीत. त्यांच्या कडे किती गाड्या, किती फ्लॅट्स, किती धन असेल हे देखील दिसले नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय झाले असेल ते देखील दिसले नाही.
दिसेलच कसे बरे हे सारे! अजिबात दिसणार नाही. यशदिप च्या म्हणण्यानुसार तो बाप माणुस होता, पण मला त्यांचा फोटो पाहिल्यावर जाणवले की हा माणुस स्किल्स, कौशल्ये, ज्ञान इ च्या धरतीवर बाप माणुस बाप माणुस असेल देखील पण तो तर होता सह्याद्रीचा खराखुरा पुत्र, सह्याद्रीचा सुपुत्र!
उंचच ऊंच शिखरांना सर करुन जणु आकाशाला गवसणी घालण्याचा आयुष्यभर प्रयत्न करीत राहणारा हा माणुस, ख-या अर्थाने जमीनीवर होता. माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली मला आठवत नाही, तरीदेखील मी हे खुप ठाम पणे म्हणु शकतो कारण त्या माणसाने अख्खे आयुष्य या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडण्यात घालवले. आणि विचार करा, ज्याचा सखा सह्याद्री असेल ज्याचा पिता सह्याद्री असेल ज्याची माता सह्याद्री असेल तो किती विशाल हृद्याचा असेल!
अंगी मोठेपणा असुनदेखील तसुभरही गर्विष्ट होणार नाही, ढळणार नाही एवढी स्थितप्रज्ञता या माणसाने सह्याद्रीकडूनच शिकली असेल. आणि सह्याद्री कुणालाही इतकी महान तत्वे सहजासहजी शिकवित नाही बरका! त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. या माणसाचे हे चक्क चौथे तप होते सह्याद्रीच्या साधनेतील. इतकी तपश्चर्या केल्यावर विचार करा, साधना-सिध्दी होणारच की!
आयुष्याची इतिकर्तव्यता कुणाला धनसंपत्ती मध्ये वाटते , कुणाला प्रसिध्दी मिळविण्यात वाटते , कुणाला सत्ता मिळविण्यात वाटते! असे काहीही वाटण्यात गैर काहीच नाही. कुणाला संगीत, कला, साहित्य तर कुणाला लिखाण, वाचन आदींमध्ये वाटु शकते. आपल्यापैकी अनेकांना आपापल्या आयुष्याचे गमक कधीना कधी तरी समजलेले असतेच. कधीतरी कुठेतरी आपणास हे समजलेले असते की आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे. या माणसाला देखील त्याने जेव्हा आयुष्यातील पहिला ट्रेक केला तेव्हाच समजले की त्याला आयुष्य कशासोबत खायचे आहे. व त्याने केलेही तसेच!
आपल्यात व त्यांच्यात फरक एवढा आहे की आपणास हे समजुन देखील आपण कधीही आपल्या अंतर्मनाचा आवाज वर येऊ देत नाही. आपणाकडे हजारो कारणे असतात आपल्याला आवडणा-या गोष्टी न करण्यासाठी. आपण एका मागुन एक अशी कारणांची शृंखलाच बनवित असतो. पण या माणसाने कधीही ‘कारणांना’ सह्याद्रीच्या प्रेमापेक्षा मोठे होऊ दिले नाही.
एखाद्या मनुष्य जर खुप चांगले आयुष्य जगत असेल, अगदी त्याच्या स्वतःच्या मनासारखे, अनेकांना त्याच्या त्या स्वच्छंदी आयुष्याचा हेवा वाटत असेल, त्याच्या तशा स्वच्छंदी जगण्याने कुणाला ही कसलाही त्रास कधीही झालेला नसेल, तर स्वाभाविक पणे आपण म्हणुन जातो की ‘राव खरच आयुष्य जगतोय बर का हा माणुस!’ आपणास हेवा वाटतो. अरुण सावंत या अवलियाविषयी यशदिप कडुन जे जे ऐकत होतो ते ऐकुण मी मनातल्या मनात सहज म्हणुन गेलो,”हा माणुस तर सह्याद्री जगला!” अनेक नवीन वाटा याने शोधल्या, अनेक नवनवीन आरोहकांना प्रोत्साहीत केले, नवीन उमदे डोंगरभटके तयार केले. सह्याद्रीमधील क्वचित अशी एखादी पायवाट असेल की जिला या माणसाचे बुट लागले नसतील. मला जे वाटले ते बरोबरच होते. हा माणुस ‘सह्याद्री’ जगला!
नंतर जेव्हा समजले की कोकणकड्यावरुन रॅपलिंग करतानाच, त्या वक्राकार, अवाढव्य, अमानवीय, रौद्र आणि तितक्याच सुंदर कोकणकड्याच्या कुशीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा उस्फुर्त पणे मनात विचार आला.
हा माणुस नुसता सह्याद्री जगलाच नाही तर सह्याद्री मेला सुध्दा!
He not only lived Sahyadri, He died also Sahydri!
अशा सह्याद्रीच्या सुपुत्रांची उणीव भरुन निघणार नाही असे काहींचे मत आहे. मला वाटते ती उणीव निर्माण होऊ नये म्हणुनच त्यांनी आजवर शेकडो हजारो तरुण-तरुणींना सह्याद्रीच्या दिक्षा दिली आहे. ज्यांना ज्यांना अरुण सावंत या अवलियाने मार्ग दाखविला, ज्याला ज्याला वाटते की या अवलियाचे जीवन सफल झाले, ज्याला ज्याला वाटते की हा सह्य-सुपुत्र खरेखुरे आयुष्य जगला, ज्याला ज्याला या सह्याद्रीची स्वप्ने पडतात, ज्याला ज्याला सह्याद्रीच्या पठारावरुन पाहणारे वा-यांची दिशा, द्शा आणि गंध कळतो, ज्याला ज्याला सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांना पादाक्रांत करण्याची स्वप्ने पडतात, ज्यांना ज्यांना शिवप्रभुंच्या गडकोटांवर जीवनाची इतिकर्तव्यता दिसते, ज्याला सह्याद्रीरुपी या निसर्गाच्या वरदहस्ताची पुसटशी देखील कल्पना आहे, ज्याला ज्याला डोंगर-द-या म्हणजे माहेर वाटते, ज्याला ज्याला सह्याद्रीतील मोसमी ढगांत स्वर्ग दिसतो, अश्या सर्वांची जबाबदारी आहे, अरुण सावंत या सह्यमहर्षीची उणीव भरुन काढण्याची! आपले जीवन निसर्गमय, सह्याद्रीमय, डोंगरमय करणे हीच खरी या सह्याद्रीच्या सुपुत्राला वाहीलेली सह्यसुमनांजली आहे!
हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे
Leave a Reply