निखळ आनंदासाठी निसर्गशिबिरे
निसर्गशाळेचे लहानग्यांसाठी निसर्गशिबिर म्हणजे मुला-मुलींसाठी आनंदोत्सव असतो. मुलांना हे शिबिर आवडणे साहजिकच आहे. याची कारणे अनेक आहेत. पैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मुक्तपणे निसर्गात बागडता येते ते केवळ निसर्गशिबिरातच. मनसोक्त खेळायला मिळते, नवनवीन मित्र बनतात, नवनवीन ताई-दादा भेटतात की जे छोट्यांना खुप आवडतात..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिबिर काळात आई-वडीलांचा, अभ्यासाचा, शाळांमधील स्पर्धेचा तगादा अजिबात नसतो. पण पालक मित्रांनो, निसर्गशिबिरे काय केवळ गम्मत, आनंदासाठीच आहेत काय? तर नाही. खेळण्यातील आनंदासोबतच निसर्गशाळेच्या निसर्गशिबिरात मुलांच्या सर्वागिण विकासासाठी जाणतेपणी तसेच अजाणतेपणी देखील संस्कार होत असतात. हे नक्की कसे व काय होत असते व अशी शिबिरे मुला-मुलींच्या विकासासाठी कशी मह्त्वाची असतात हे आपण पुढे वाचुयात.
सर्वांगिण विकासासाठी निसर्गशिबिर
जग मोठे आहे..
जग मोठे आहे याची प्रचीती मुलांना या शिबिरातुन येते. जगात अनेक प्रकारची, अनेक श्रेणींचे, अनेक भाषांचे, अनेक वेषभुषांचे, अनेक रंगांचे लोक आहेत व इतके वैविध्य असुनही आपण सारे मनुष्यच आहोत आणि आपण सारे ‘एक’ आहोत या एकात्म भावाचा संस्कार व्यवस्थित आयोजित केलेल्या शिबिरांमधुन नक्कीच होतो. आणि गम्मत म्हणजे हा संस्कार कसल्याही दडपशाहीने, नियमावलीने रुजवला जात नाहीतर हसतखेळत मुलांसोबतच तंबु मध्ये राहणा-या प्रशिक्षकांकडुन होतो. विशेषतः सध्याच्या काळात जिथे मुलांना सामाजिक एक्स्पोजर अजुनही नीटसे मिळत नाहीये तिथे अशी शिबिरे खुप मोलाची आहेत.
आत्मनिर्भरता अंगी येते
घरातील कुणीही मोठे सोबत नसताना एखाद्या छोट्या मुलाला जर कशाची आवश्यकता असेल तर त्याला स्वतःहुन बोलते व्हावे लागते. हे बोलणे मग स्वतःचा विचार , मत मांडण्यासाठी ही असेल किंवा गरजेच्या वस्तु, अन्न मिळविण्यासाठी देखील असु शकेल. स्वतःसाठी बोलणे तेही ‘कंफर्ट झोन’ मध्ये नसताना हे देखील मुलांना नकळत शिकता येते. स्वतःची काळजी घेण्यासाठी मुले सक्षम बनण्यासाठी अशा शिबिरांमुळे खुप मदत होते.
साहचर्यातुन यश…
एखाद्या टीम ॲक्टिव्हिटी मध्ये टीम वर्कचे महत्व मुलांना समजते सोबतच अशा ॲक्टिव्हिटी मधुन नेतृत्वगुणांचा विकास देखील नकळत होत असतो. पीअर प्रेशर किंवा टीचर प्रेशर किंवा एल्डर प्रेशर इत्यादीमुळे ही मुले भविष्यात सहसा विचलीत होत नाहीत. उलट एकमेकांस मदत करण्याची व सर्वांनी मिळुन ध्येय गाठण्याचा संस्कार देखील अशा शिबिरांमधुन होत असतो.
संवाद कौशल्याचा विकास साधतो
अनेक पालकांची तक्रार असते की आमचा मुलगा/मुलगी फार बोलत नाही किंवा खुपच जास्त बोलतात. हे दोन्ही प्रकार अगदी टोकाचे आहेत. निसर्गशिबिरांमध्ये मुला-मुलींना बोलण्यासाठी एक हक्काचे, मैत्रीचे, अनौपचारिक व्यासपीठ मिळते. प्रशिक्षकांकडे पाहुन मुलांना आपणही असेच बोलके अथवा ‘मर्यादेत’ बोलके व्हावे असे वाटते. प्रशिक्षकांना या सा-यांचा अनेक वर्षांचा अनुभव असतो व मुलांसाठी मोठे अनुकरणाचे उदाहरण असतात याचे भान असलेले असतात. त्यामुळे साहजिकच अशी शिबिरे मुलांच्या सोशलायझिंगसाठी खुपच उपयुक्त ठरतात.निखळ मैत्रीचा ठेवा
आपल्या शाळेत, वर्गात नसणारे, शेजारी वास्तव्यास नसणारे व भविष्यात कदाचित पुन्हा कधीही भेट होणार नाही असे नवनवीन मित्र-मैत्रिणी शिबिरांमध्ये भेटतात. ही मैत्री शिबिरापुरतीच असली तरीही मैत्रीचे बंध खुपच घट्ट असतात. मैत्री कशी करावी याचे देखील शिक्षण नकळतच होऊन जाते. प्रसंगी काही खोडकर मुलेसुध्दा भेटतात पण अशांसोबतच देखील कसे वागले पाहिजे याचे ही शिक्षण आपोआप होतेच.
