'काळचक्र अव्याहतपणे फिरत आहे, गतिमान आहे,' हे अगदी परवलीचे शब्द आहेत. पण हे फिरते म्हणजे नेमके काय होत असते? "फिरते" हा शब्द खरोखर योग्य आहे का?
मी या विषयाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपण काळाचे सहजपणे तीन भाग केले आहेत—भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.
काळाच्या पडद्यावरील एखादा अंक या तिन्हीपैकी कोणत्या प्रकारात मोडतो, हे समजण्यासाठी किंवा एक समान सामंजस्य निर्माण करण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करीत असतो.
काळाच्या पडद्यावरील हे नाट्य एका मागोमाग एक अंक सादर करीत सदैव सुरूच असते.
जेव्हा आपण मन नावाच्या साधनाच्या आधारे या पडद्यावरील एखादा अंक पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो अंक भूतकाळातील आहे असे आपण म्हणतो, मानतो; किंबहुना सर्वच तसे मानतात.
प्रसंगी मनाऐवजी आपण कागद वापरतो. प्रसंगी लॅपटॉप किंवा मोबाईल वापरतो. काही अंक ताम्रपटांवर लिहिलेले आहेत, तर काही दगडांवर कोरलेले आहेत.
हेतुपुरस्सर, कोणत्या ना कोणत्या साधनाचा—आणि आपले मनदेखील असेच एक साधन आहे मंडळी—उपयोग करून मानवाने या घटना नोंदवून ठेवल्या आहेत.
हे असे करण्याची प्रेरणा मानवाला नेमकी कशामुळे मिळाली असेल?
पण काय, फक्त मानवाने लिहून ठेवलेलेच अंक आपण पाहू शकतो का?
तसे नाही.
निसर्गानेदेखील विविध पद्धतींनी अनेक अंक लिहून ठेवले आहेत.
उदाहरणार्थ—जीवाश्म.
या जीवाश्मांचा अभ्यास करून आपण नेमके काय करीत असतो?
आपण काळाच्या पडद्यावरील
एक अंक वाचण्याचा...
पाहण्याचा...
ऐकण्याचा...
आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
म्हणजेच, अशी साधने जी आपल्या शरीराचा प्रत्यक्ष भाग नाहीत—आणि मनदेखील त्यांपैकीच एक आहे—त्यांच्या साहाय्याने आपण काळाच्या पडद्यावरील एखादा अंक पाहू शकतो; तोच भूतकाळ.
या सर्व साधनांच्या मदतीने आपण भूतकाळाचा आभास निर्माण करतो. जणू एखादा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा प्ले करावा, तसे आपण त्या घटना आपल्या मनःपटलावर पुन्हा अनुभवू शकतो.
भूतकाळातील अनुभव आणि ज्ञान जतन करण्यासाठीच ही सर्व साधने आहेत.
पण जसा एखादा व्हिडिओ पाहताना
आपण त्या व्हिडिओचा भाग होऊ शकत नाही,
तसाच...
भूतकाळाचे पुनरावलोकन करताना
आपण कधीही भूतकाळाचा भाग होऊ शकत नाही.
ही झाली त्या दोन साधनांपैकी पहिली साधने.
आता मन या साधनाकडे पाहू.
मन हे एकमेव साधन असे आहे, जे मानवाबरोबरच इतर प्राण्यांकडेही आहे.
प्राण्यांनादेखील मन आहे किंवा ते मनाचा उपयोग करू शकतात, हे आज सर्वमान्य आहे.
काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका प्राणीप्रेमी डॉक्टरच्या निधनानंतर हत्तींचा एक कळप तब्बल बत्तीस किलोमीटर चालत त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
ही घटना प्रत्यक्षात घडली की नाही, हे मला निश्चित माहीत नाही.
पण जर ती खरी असेल...
त्या हत्तींना एका माणसाच्या मृत्यूची जाणीव कशी झाली असेल?
कुणी सांगितले असेल?
कोणत्या भाषेत?
कोणत्या संकेतांनी?
आणि घरापर्यंतचा रस्ता त्यांच्या लक्षात कसा राहिला असेल?
दुसरे उदाहरण पाहू.
एखादा पाळीव कुत्रा, त्याचे डोळे बांधून, बंद पेटीत घालून, घरापासून खूप दूर नेऊन सोडला तरी काही दिवसांनी तो पुन्हा आपल्या घरी परत येतो.
आणखी एक उदाहरण.
काल मी नॅशनल जिओग्राफिकवर 'Cheetas Growing Too Fast' हा कार्यक्रम पाहिला.
एका अभ्यासकाने दीड वर्षे एका मादी चित्त्याबरोबर आणि तिच्या पाच पिलांबरोबर राहून त्यांचा प्रौढत्वापर्यंतचा प्रवास चित्रित केला होता.
अभ्यास संपल्यानंतर तो निघून गेला.
काही काळानंतर तो पुन्हा त्या जंगलात गेला.
त्याला दूरवर एक मादी चित्ता दिसली.
तो तिच्या अगदी जवळ गेला.
काही मिनिटांनी ती चित्ता त्याच्या जवळ आली...
आणि त्याच्या चेहऱ्याला अलगद चाटू लागली.
म्हणजेच...
प्राण्यांनादेखील
माणसे ओळखता येतात.
ठिकाणे लक्षात राहतात.
भूतकाळातील अनुभव
पुन्हा जागे होतात.
अशा अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऐकल्या असतील.
यावरून असे म्हणता येईल की, काळाच्या पडद्यावरील होऊन गेलेल्या अंकांना पुन्हा अनुभवण्याची क्षमता केवळ मानवाकडेच नाही; ती इतर प्राण्यांकडेही आहे.
फरक एवढाच की, मानव मनावरच अवलंबून राहत नाही.
तो घटना विविध साधनांमध्ये नोंदवून ठेवतो.
इतर प्राणी मात्र, निदान आज तरी, प्रामुख्याने मन या एकाच साधनाचा उपयोग करतात.
मला कधी कधी असे वाटते...
मन हे वैयक्तिक नसून
एक वैश्विक साधन असावे.
जणू एखादा सामूहिक संसाधनसाठाच.
कदाचित मानवाला या वैश्विक साधनाचा इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रवेश मिळाला असावा.
हा विचार योग्य आहे की नाही, हे मला माहीत नाही.
पण तो विचार करण्यासारखा नक्कीच आहे.
त्या दोन साधनांपैकी
पहिले साधन आपण पाहिले...
मग
दुसरे साधन कोणते?